असे करा विहीर, कूपनलिका पुनर्भरण

*राष्ट्रीय कृषी विकास योजना*

^^^ असे करा विहीर, कूपनलिका पुनर्भरण ^^^

पावसाळ्याच्या दिवसात विहिरीत भूजल पुनर्भरण केल्याने ज्या जलस्तरातून पाणी उपसले गेले होते, त्या जलस्तरात विहिरीतील पाणी शिरते. पावसाळ्याच्या संपूर्ण हंगामात अशा प्रकारे पाणी भरलेल्या विहिरींच्या सर्वांत जास्त खोलवर असलेल्या थरात भूजलसाठा पूर्ववत होऊ शकतो. याचबरोबरीने कूपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण करणे शक्‍य आहे. 

*डॉ. सुधीर दहीवाळकर, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. सुनील कदम, किरण पवार* 

अलीकडच्या काळात भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने भूजल पातळी खालावत आहे. भूजलाच्या शोधात प्रत्येक शेतकरी विहिरी दरवर्षी खोल करताना दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे विहिरीद्वारे भूजलाचा उपसा होण्याचे प्रमाण, हे जमिनीत मुरणाऱ्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. पर्यायाने भूजल पातळी खोलवर जात आहे. वर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी भूजल पातळी स्थिर राहणे गरजेचे आहे. भूजलसाठ्यात वाढ होण्यासाठी अति उपशावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. याचबरोबरीने भूजल पातळी स्थिर राहण्याकरिता दुसरा उपाय म्हणजे भूजल पुनर्भरण हा होय. 

जमिनीमध्ये अनेक वेगवेगळे व भिन्न थर आढळतात. या थराची जाडी, आकारमान वेगवेगळे आहेत. पहिला थर मातीचा. या थरातून पाणी मुरण्याचा वेग दर दिवसाला साधारणपणे दोन सें.मी. असतो. मुरुमाच्या थरातून पाणी वाहनाचा हाच दर 10 सें.मी. असू शकतो. ज्या खडकांना भेगा/फटी, सळ व सूक्ष्म छिद्रे असतात त्या खडकातून पाणी वहनाचा हाच दर 200 सें.मी. एवढासुद्धा असू शकतो. या सर्वांचा एकत्रितपणे विचार केला असता पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यापासून भूजल साठ्यापर्यंत पोचण्यास साधारणपणे एक महिना किंवा जास्त कालावधी लागतो. म्हणजेच नैसर्गिक भूजल भरणाचा वेग फार कमी आहे हे दिसून येते. पाणी उपसण्याचा सध्याचा आपला वेग या वेगापेक्षा जास्त आहे. यावरून विहीर पुनर्भरण हे किती महत्त्वाचे व गरजेचे आहे, ते दिसून येते. भूजल पुनर्भरण वेगवेगळ्या उपायांनी करता येते. शेततळी (अस्तर नसलेली), पाझर तलाव, बंधारे, पुनर्भरण चर आणि विहीर पुनर्भरण हे त्यापैकी काही प्रमुख उपाय आहेत. 

शेततळी, पाझर तलाव, बंधारे तथा पुनर्भरण चर हे भूजल पुनर्भरणाचे उत्तम उपाय होत. पण या उपायांद्वारे पुनर्भरणाद्वारे भूजल साठा जास्त वेगाने वाढविला जातो. महाराष्ट्रातील विहिरींची संख्या लक्षात घेता व सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितरीत्या हा उपाय राबविल्यास भूजल पातळीत स्थिरता आणता येईल. 

राष्ट्रीय कृषी विकास योजना

...असे करा विहीर पुनर्भरण 
पावसाचे पाणी विहिरीत सोडणे विहीर पुनर्भरण होय. यासाठी ओढा किंवा नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी, पावसाचा अपधाव यांचा वापर करता येतो. पावसाळ्यात विहीर भरल्याने विहिरीतील पाणी जमिनीत खोलवर मुरेल. ज्या जलस्तरातून पाणी उपसले गेले होते, त्या जलस्तरात विहिरीतील पाणी शिरते. पावसाळ्याच्या संपूर्ण हंगामात अशा प्रकारे पाणी भरलेल्या विहिरींच्या सर्वांत जास्त खोलवर असलेल्या थरात भूजलसाठा पूर्ववत होऊ शकतो. विहिरीत गाळ मिश्रित पाणी भरल्यास आणि विहिरीत गाळ असल्यास ज्या सूक्ष्म भेगांतून/छिद्रातून गाळयुक्त पाणी जलस्तरात वाहताना गाळामुळे ती छिद्रे/भेगा/फटी बंद पडण्याचा दाट धोका निर्माण होतो व जर ही छिद्रे बंद पडली तर विहीर बंद पडू शकते. म्हणून गाळविरहित पाणी विहिरीत सोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

विहीर पुनर्भरणाची पद्धत - 
1) विहीर व ओढ्याच्या अंतरामध्ये तीन मीटर व दोन मीटर लांबीचे दोन स्वतंत्र खड्डे घ्यावेत. 
2) पहिला खड्डा तीन मीटर लांब, तीन मीटर रुंद व एक मीटर खोल घ्यावा. 
3) दुसरा खड्डा पहिल्या खड्ड्यापासून तीन मीटर अंतरावर घ्यावा. 
4) दुसरा खड्डा दोन मीटर लांब, 1.5 मीटर रुंद व दोन मीटर खोल घ्यावा. 
5) पहिल्या खड्ड्याच्या मध्यभागी एक आडवे छिद्र घेऊन हा खड्डा पी.व्ही.सी. सहा इंची पाइपद्वारे दुसऱ्या खड्ड्यास जोडावा. 
6) पहिला खड्डा दगड गोट्यांनी भरावा. 
7) दुसऱ्या खड्याच्या तळाशी 0.45 मीटर जाडीचा खडीचा थर भरावा. त्या थरावर 0.45 मीटर जाडीचा वाळूचा थर भरावा. त्यानंतर 0.45 मीटर जाडीचा बारीक वाळूचा भरून त्यावर 0.15 मीटर जाडीचा कोळशाचा थर भरून घ्यावा. हा खड्डा तळापासून चार इंची पी.व्ही.सी. पाइपद्वारे विहिरीशी जोडावा. 
8) ओढ्यातील पाण्यामधील पालापाचोळा, कचरा इत्यादी तीन मीटर लांब, तीन मीटर रुंद व एक मीटर खोल खड्ड्यात स्थिरावतील आणि कण विरहित पाणी पाइपद्वारे दोन मीटर लांब, 1.5 मीटर रुंद व दोन मीटर खोल खड्ड्यात जाईल. 
9) दुसऱ्या खड्ड्यातून गाळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाइपद्वारे जाऊन विहीर पुनर्भरण होईल. 
10) वरीलप्रमाणे विहीर पुनर्भरण करण्यासाठी साधारणतः 12,000 रुपये एवढा खर्च येतो. 

विहीर पुनर्भरणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या अधिक कार्यक्षमता असलेल्या चार थरांच्या गाळण यंत्रणेचा वापर करावा. या गाळण यंत्रणेसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे. 


राष्ट्रीय कृषी विकास योजना

कूपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण 
पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. 
1) कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे. 
2) कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा. 
3) खड्ड्यातील उंची एवढ्या केसिंग पाइपच्या भागात एक-दोन सें.मी. अंतरावर सर्व बाजूने चार-पाच मि.लि. व्यासाची छिद्रे पाडावीत. 
4) या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी. 
5) खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या भागात दगडगोटे, त्यावरच्या भागात खडी नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी. 
6) अशाप्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल. 
7) कूपनलिका पुनर्भरण करण्यासाठी साधारणतः 5,000 रुपये एवढा खर्च येतो. 

कूपनलिका पुनर्भरणासाठी लागणारे साहित्य - 
लोखंडी ड्रील (चार-पाच मि.मी.) काथ्या, गाळणी, धुतलेली वाळू, वाळूची चाळ, खडी आणि दगडगोटे. 
विहीर व कूपनलिका पुनर्भरणाच्या वेळी घ्यावयाची काळजी - 
1) ओढ्याला येणारे पाणी हे क्षार व रसायनविरहित असावे. 
2) विहिरी पाणी तळापर्यंत पाइपद्वारे पोचवावे. 
3) पुनर्भरणापूर्वी दोन गाळणी खड्डे असावेत. 
4) पुनर्भरणापूर्वी विहिरीतील गाळ काढून टाकावा. 
5) पुनर्भरण हे गाळलेल्या व स्वच्छ पाण्यानेच करावे. 
6) ज्या क्षेत्रावर मीठ फुटले असेल म्हणजेच क्षार जमा झाले असतील, त्या क्षेत्रावरील पाणी विहीर पुनर्भरणास वापरू नये. 
7) औद्योगिक क्षेत्रातील पावसाचे पाणी पुनर्भरणास वापरू नये. 
8) साखर कारखाना परिसरात जेथे मळी जमिनीवर पसरली जाते, त्या भागातील पाणी वापरू नये. 
9) सूक्ष्म जिवाणूजन्य तथा रोगराईस्थित क्षेत्रातील पाणी वापरू नये. 
10) वाळू, गोटे यांचा वापर करून तयार केलेली गाळणी पावसाळ्यापूर्वी एकदा स्वच्छ करावी. 

*संपर्क -* 02426-243268/ 243326 
(लेखक भूजल संशोधन प्रकल्प, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येते कार्यरत आहेत.)

*स्त्रोत - एग्रोवन* 

पिक सिंचन पाणी गरज, पाणी व्यवस्थापन, पाणी संवर्धन, इत्यादी शेती क्षेत्रातील पाणी निगडीत शास्त्रीय माहितीकरिता आजच 'राष्ट्रीय कृषी विकास योजना - सिंचन पाणी गरज सल्ला सेवा' हे फेसबूकवरील लाईक करा...
 आपण आपल्या ब्लॉगला भेट देऊनही सविस्तर लेख मिळवू शकता...

खालील लिंकवर जाऊन आपले फेसबुक पेज लाईक करा...
https://www.facebook.com/iwrasrkvy/

खालील लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला भेट द्या...
http://rkvyiwras.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

शेततळ्यातून सायफन पद्धतीने द्या पिकांना पाणी

कमी पाझर असलेल्या जमिनीत बांधा शेततळे